Kalpanaraje Bhosale Satara । आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने वाद; कल्पनाराजे भोसले यांची तीव्र प्रतिक्रिया
सातारा : राज्याच्या आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर कल्पनाराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत हा निर्णय “धोक्याची घंटा” असल्याचे म्हटले आहे.कल्पनाराजे भोसले म्हणाल्या की, “अभ्यासक्रमातून अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक बाबी वगळल्या जात असतील, तर भविष्यात इतिहासाचं विकृतीकरण होण्याची शक्यता आहे. हे जर असेच सुरू राहिले, तर कालांतराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावरही पडदा पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.” त्या पुढे म्हणाल्या, “पृथ्वीवर चंद्र, सूर्य आणि तारे अस्तित्वात आहेत, तोपर्यंत या देशातील प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज कायम राहतील. त्यांच्या कार्याची आणि इतिहासाची जपणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
दरम्यान, अभ्यासक्रमातील या बदलावर विविध सामाजिक आणि राजकीय स्तरातूनही प्रतिक्रिया उमटत असून, इतिहास विषयातील घटक कमी करण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाकडून या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणीही जोर धरत आहे. या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा इतिहास आणि शिक्षण धोरणावर चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)