राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पण, आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात २४ तारखेपासून १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता २४ जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाला त्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला दिली मंजुरी, त्यामुळे सोमवारपासून राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.
राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बुधवारी शाळा पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिले होते. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरे यांची बैठक पार पडली. यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसंच शाळा सुरू करण्याबाबतच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.




Comments (0)
Facebook Comments (0)