हिमस्खलनात भारतीय लष्कराच्या ७ जवानांचा मृत्यू

हिमस्खलनात भारतीय लष्कराच्या ७ जवानांचा मृत्यू


अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकून बेपत्ता झालेले भारतीय लष्कराचे सातही जवान शहीद झाले आहेत. मंगळवारी ही माहिती देताना भारतीय लष्करानं सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात भारत-चीन सीमेवर हिमस्खलनामुळे बेपत्ता झालेल्या सात जवानांचे मृतदेह सापडले आहेत.

६ फेब्रुवारी रोजी कामेंग सेक्टरमधील उच्च उंचीच्या भागात हिमस्खलनात भारतीय लष्कराचे सात जवान अडकले होते. अडकलेल्या जवानांना शोधण्यासाठी त्याच दिवसापासून शोध आणि बचाव कार्य सुरू होतं.

भारतीय लष्करानं आता त्या सर्व जवानांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. लष्कराला त्या सर्व जवानांचे मृतदेह सापडले आहेत. या भागातील हवामान गेल्या काही दिवसांपासून खराब आहे आणि येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. लष्करानं सांगितलं की, शोध आणि बचाव कार्य आता संपले असून हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सातही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

लष्करानं सांगितलं की, हा भाग १४,५०० फूट उंचीवर आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून या भागात मुसळधार बर्फवृष्टीसह खराब हवामानाच्या बातम्या येत आहेत. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार हिमवृष्टीसह खराब हवामान आहे.

हिमस्खलनात हे सात जवान शहीद
अरुणाचल प्रदेशातील हिमस्खलनात मृतांमध्ये हवालदार जुगल किशोर, आरएफएन अरुण कट्टल, आरएफएन अक्षय पठानिया, आरएफएन विशाल शर्मा, आरएफएन राकेश सिंग, आरएफएन अंकेश भारद्वाज आणि जीएनआर गुरबाज सिंग यांचा समावेश आहे. या सर्व जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला भारतीय लष्कराने (ईस्टर्न कमांड) आदरांजली वाहिली.

राष्ट्रपती-पीएम मोदींसह अनेक नेत्यांनी व्यक्त केला शोक
राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक नेत्यांनी अरुणाचल प्रदेशातील हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या सात जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनामुळे झालेल्या अपघातात जवानांच्या मृत्यूचे दुःख शब्दात वर्णन करता येणार नाही. देशाच्या सेवेत शूर जवानांनी बलिदान दिलं आहे. त्यांचे निस्वार्थ बलिदान सदैव स्मरणात राहील. माझ्या भावना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटलं की, अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनामुळे भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूनं दुःख झालं आहे. देशाच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान आम्ही कधीही विसरणार नाही. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो.