भाजप नेत्यांकडे संपूर्ण शहर विकासाच्या दुरदृष्टीचा अभाव

भाजप नेत्यांकडे संपूर्ण शहर विकासाच्या दुरदृष्टीचा अभाव

पुर्वी रामकृष्ण मोरे, अजित पवार यांचे स्थानिक नेत्यांवर नियंत्रण होते. वरीष्ठ नेते शहराच्या सर्वांगिन विकासासाठी नेहमीच तत्पर रहिल्याने शहराचा विकास झाला. मात्र २०१७ साली महापालिकेवर भाजपाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचा विकास व्हावा, शहराची प्रगती व्हावी असा दुरदृष्टीचा विचार कोणत्याही नेत्याने न करता केवळ निविदांमध्ये पैसे खाण्यासाठी या महाशयांनी शहराचे तुकडे केल्याने शहराचा विकास भरकटल्याचा आरोप माजी महापौर हनुमंत भोसले यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक 16 नेहरूनगर व प्रभाग क्रमांक १८ मासुळकर कॉलनी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हनुमंत भोसले बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, नगरसेवक राहूल भोसले, समीर मासुळकर, संजय वाबळे, माजी महापौर वैशालीताई घोडेकर, माजी उपममहापौर मोहम्मदभाई पानसरे, नगरसेविका गीताताई मंचरकर, माजी नगरसेवक तानाजी खाडे, विनायक रणसुंभे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य फजल शेख यांच्यासह संदीपान झोंबाडे, गंगाताई धेंडे, मनिषाताई गटकळ, अश्विनीताई कांबळे, कविताताई खराडे, माजी उपमहापौर विश्रांतीताई पाडाळे, प्रशांत कापसे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व दोन्ही प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना हनुमंत भोसले म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराचा आज जो विकास आपणास पहावयास मिळत आहे तो शरद पवार, रामकृष्ण मोरे, अजित पवार यांच्यासारखे दुरदृष्टीचे नेते लाभल्यामुळेच. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा संपूर्ण शहराच्या विकासाचा विचार वरीष्ठ नेते करत होते. वरिष्ठांचे नियंत्रणही स्थानिक नेतेमंडळींवर असायचे, चुकीचे काम होणार नाही यासाठी दक्षता घेतली जायची. मात्र सन २०१७ साली भाजपाची महापालिकेत सत्ता आल्यापासून वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे.

शहर विकासापेक्षा स्वस्वार्थाला आलेले महत्त्व, नेत्यांमध्ये नसलेले एकमत आणि भ्रष्टाचार हाच एकमेवर अजेंडा असल्याने शहराचा विकास भरकटला आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातील जनतेच्या दृष्टीने एकही निर्णय घेण्यात आला नसून केवळ ठेकेदार आणि स्वत:चा आर्थिक फायदा कसा होईल यालाच महत्त्व देण्याचे आले. भाजपच्या राज्यपातळीवरील एकाही नेत्याचे नियंत्रण स्थानिक पातळीवर नसल्याने दोन्ही आमदारांनी ‘हम करे सो कायदा’ आणि आम्ही म्हणेल तो विकास या दंडेलशाहीने कारभार केला. दोन्ही आमदारांनी शहराचे दोन भाग करून ठेकेदारी केल्याने शहराचे पाच वर्षांत वाटोळे झाले आहे. शहराला पुन्हा पुर्नवैभव प्राप्त करून द्यायचे असल्यास तसेच शहर विकासाची गाडी पुन्हा रुळावर आणावयाची झाल्यास राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहनही भोसले यांनी यावेळी केले.