Pune Crime Story : निसर्ग, प्रेम की सापळा? सियाच्या प्लॅनमागची 5 धक्कादायक सत्यं
पुणे : लोहगड किल्ल्यावरुन दरीत पडून केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला. लग्नाच्या तोंडावर केतनचा शेवट झाला. मात्र या प्रकरणाला नाट्यपूर्ण वळण मिळालं आहे. हा अपघात नसून घातपात असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात केतनची नियोजित वधू, तिचा मित्र आण अन्य साथीदारांनी कट रचल्याची माहिती उघड झाली आहे. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात मेघालयमध्ये हनिमूनला गेलेल्या सोनम रघुवंशीनं तिचा पती राजा रघुवंशीची हत्या केली होती. ११ मे २०२५ रोजी सोनम आणि राजाचा इंदूरमध्ये विवाह झाला. यानंतर ते दोघे २१ मे रोजी हनीमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी चेरापुंजी परिसरातून दोघे बेपत्ता झाले. यानंतर २ जूनला एका धबधब्याजवळ राजाचं शव कुजलेल्या स्थितीत सापडलं. काही अज्ञात व्यक्तींनी राजाला मारहाण केली आणि दागिने हिसकावून त्याला दरीत ढकलून दिलं, असं सोनमनं पोलिसांना सांगितलं होतं. पण पोलीस तपासात तिचा दावा खोटा निघाला.
केतन अग्रवाल आणि राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील साम्यं-
१. नवविवाहित/लग्न काही महिन्यांवर: दोन्ही तरुणांच्या हत्या लग्नानंतर काही दिवसांनी किंवा लग्नाच्या तोंडावर झाल्या आहेत. राजाचा शेवट मेघालयात ट्रेकिंग दरम्यान झाला. त्याच प्रमाणे लोहगडावर केतनचा शेवट झाला. या प्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल अडचणीत आली आहे. केतन आणि सिया याच वर्षी विवाह बंधनात अडकणार होते.
२. जोडपं अन् तिसरी व्यक्ती: दोन्ही प्रकरणाच्या तपासांमध्ये तिसऱ्या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका आढळून आली. सोनमनं तिचा प्रियकर राज कुशवाहच्या मदतीनं राजाला संपवलं. तर केतनच्या होणाऱ्या पत्नीनं तिचा मित्र आणि अन्य साथीदारांसह कट रचला होता.
३. गुन्हा लपवण्यासाठी निसर्गाचा, दुर्गम भागांचा वापर: केतन आणि राजा यांना संपवण्यासाठी दुर्गम स्थळांची निवड करण्यात आली. दोन्ही जोडपी ट्रेकिंगला गेली होती. तिथेच गुन्हा घडला. निसर्गरम्य निर्जन स्थळांचा वापर गुन्हा लपवण्यासाठी पद्धतशीरपणे करण्यात आला. केतनला ३५० फूट उंचीवरुन खाली ढकलण्यात आलं. तर राजाचं शव कुजलेल्या अवस्थेत चेरापुंजीतील एका धबधब्याजवळ आढळून आलं.
४. अपघात भासवण्याचा प्रयत्न: दोन्ही ठिकाणी पद्धतशीरपणे खून करण्यात आले. त्यानंतर ते अपघात भासवण्यात आले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तोल गेल्याचं केतनच्या मृत्यूनंतर आरोपींकडून सांगण्यात आलं. तर मेघालय हनिमून प्रकरणात सोनम आणि राजा बेपत्ता झाल्याची माहिती आधी समोर आली. यानंतर त्यांच्या सोबत लुटमारीची घटना घडल्याचं सांगण्यात आलं. अज्ञातांनी राजाला खाली ढकललं, असा दावा सोनमनं केला होता.
५. पूर्वनियोजित गुन्हे - केतन आणि राजा यांना संपवण्यासाठी आधीपासूनच कट रचण्यात आले होते. मित्रांच्या साथीनं दोघांना संपवण्यात आलं. दोन्ही गुन्हे रागाच्या भरात नव्हे, तर अतिशय थंड डोक्यानं नियोजनबद्ध रितीनं करण्यात आले.




Comments (0)
Facebook Comments (0)