छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी लोकमान्य टिळकांनी खूप काही केले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड किल्ल्यावरील समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असल्याचं सांगितलं. राज ठाकरेंच्या या विधानानंतर राज्यात पुन्हा एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले. राज ठाकरेंच्या या दाव्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. त्यानंतर लोकमान्य टिळक यांचे वंशज, खापर पणतू कुणाल टिळक यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
कुणाल टिळक म्हणाले, राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी जो काही उल्लेख केला त्या विषयी आम्हाला काहीही आक्षेप नाही. लोकमान्य टिळकांच्या हयातीत जरी ही समाधी बांधली गेली नाही तरी त्यांनी समाधी बांधण्यासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या विधानावर आमचा काहीही आक्षेप नाही. या विधानानंतर जी काही राजकीय चिखलफेक सुरू आहे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत त्याला आमचा आक्षेप आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकमान्य टिळक यांच्याविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत, लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत. त्यांच्याविषयी अपशब्द वापरत आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याचा अपमान केला जात आहे. लोकमान्य टिळक यांच्यासह काही ब्राह्मणांच्या बाबतीत देखील आक्षेपार्ह शब्द वापरले जात आहे. हे सर्व आता थांबले पाहिजे. असे देखील कुणाल टिळक म्हणाले.




Comments (0)
Facebook Comments (0)